Notes-इयत्ता नववी- इतिहास-पाठ-१ : इतिहासाची साधने-Maharashtra Board

इतिहासाची साधने

महाराष्ट्र बोर्ड-इयत्ता नववी- इतिहास-पाठ-१ 

नोट्स

अभ्यासघटक :

  • लिखित साधने
  • भौतिक साधने
  • मौखिक साधने
  • दृक्-श्राव्य साधने

भारतीय इतिहासाचा कालखंड :

भारतीय इतिहास प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक अशा तीन प्रमुख कालखंडांमध्ये विभागलेला आहे.

  • अश्मयुगापासून आठव्या शतकापर्यंतचा काळ प्राचीन कालखंड,
  • नवव्या शतकापासून अठराव्या शतकापर्यंतचा काळ मध्ययुगीन कालखंड,
  • १९ व्या शतकात इंग्रजांच्या राजवटीपासून सुरू होणारा काळ आधुनिक कालखंड म्हणून ओळखला जातो.

आधुनिक काळातील इतिहासाची साधने :

  • आधुनिक काळात इतिहासाचे लेखन करताना लिखित, भौतिक, मौखिक आणि दृक्-श्राव्य अशी विविध साधने वापरली जातात.
  • तसेच, इतिहासलेखनासाठी प्रादेशिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीय ते आंतरराष्ट्रीय पातळीवरील साधनांचा आधार आवश्यक असतो.

लिखित साधने :

'लिखित साधने' हे इतिहासलेखनाचे अत्यंत विश्वसनीय असे साधन आहे.

  • लिखित साधनात वृत्तपत्रे, नियतकालिके, ग्रंथ, सरकारी गॅझेट, कोशवाङ्मय अशा छापील साहित्याचा समावेश होतो.
  • रोजनिशी, पत्रव्यवहार, अभिलेखागारातील कागदपत्रे इत्यादी हाती लेखन केलेले साहित्यही लिखित साधनातच मोडते.

या साधनांच्या आधारे समाजजीवन, चळवळी, प्रशासन, सांस्कृतिक व सामाजिक बाबींचा अभ्यास करता येतो.

छापील प्रसारपाध्यमे :

इ. स. १९६१ ते २००० या काळात वृत्तपत्रे, नियतकालिके अशा छापील प्रसारमाध्यमांना महत्त्व होते. भारताने स्वीकारलेले उदारीकरणाचे धोरण व इंटरनेटचा (आंतरजाल) सार्वत्रिक प्रसार यांमुळे छापील प्रसारमाध्यमांना दुसरा पर्याय उपलब्ध झाला.

(i) वृत्तपत्रे  :

  • उदारीकरणाचा स्वीकार आणि आंतरजालाचा सार्वत्रिक प्रसार होण्याच्या काळातही वृत्तपत्रासारख्या छापील प्रसारमाध्यमाचे महत्त्व कायम आहेच.
  • वृत्तपत्रे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींवर आणि राजकारणावर प्रकाश टाकतात.
  • कला, क्रीडा, सांस्कृतिक व सामाजिक घटना अशा मानवी जीवनाशी संबंधित असणाऱ्या गोष्टींवर चर्चा करतात.
  • वृत्तपत्रे विविध माहितींवर व घटनांवर प्रादेशिक पुरवण्या काढतात. वर्षअखेरीस काही वृत्तपत्रे वर्षभरातील प्रमुख घटनांचा आढावा घेतात. ही सर्व माहिती लिखित पुरावा म्हणून इतिहास अभ्यासकाला उपयुक्त ठरते.

(ii) प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (PTI) :

  • देशभरातील वृत्तपत्रांना जगभरातील बातम्या पुरवण्याचे काम पीटीआय, यूएनआय, समाचार भारती व हिंदुस्थान समाचार या संस्था करतात.
  • जगभरातील महत्त्वाच्या घटनांचे प्राथमिक तपशील, महत्त्वाच्या विषयांवरील लेख प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाकडून मिळतात.
  • पीटीआय ही वृत्तसंस्था १९५३ पासून वृत्तलेख, छायाचित्रे, आर्थिक, वैज्ञानिक विषयांवरील माहिती वृत्तपत्रांना देत आली आहे. १९९०च्या दशकात पीटीआयने टेलिप्रिंटर्सऐवजी उपग्रह प्रसारण तंत्राद्वारे बातम्या देशभर पाठवायला सुरुवात केली आहे.
  • पीटीआय ही वृत्तसंस्था सरकारी असून या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातम्या अधिकृत आणि विश्वसनीय मानल्या जातात. म्हणूनच हा मजकूर इतिहासलेखनासाठी महत्त्वाचा व उपयुक्त असतो.

(iii) टपाल तिकिटे :

  • टपाल तिकिटे इतिहासाचे मौल्यवान दस्तऐवज असतात.
  • भारताच्या स्वातंत्र्यानंतर टपाल तिकिटांमध्ये विविध बदल झाले आहेत.
  • त्यांतील विषय, रंगसंगती आणि रचना यांमधून सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक घडामोडींचा मागोवा घेता येतो.
  • टपाल खाते राजकीय नेत्यांवर, फुलांवर, प्राणी-पक्ष्यांवर, एखाद्या घटनेवर, एखाद्या घटनेच्या रौप्य, सुवर्ण, अमृतमहोत्सव, शतक, द्विशतक, त्रिशतकपूर्ती निमित्त तिकिट काढते. विशेष प्रसंगानिमित्ताने जारी होणारी तिकिटे इतिहासासाठी महत्त्वाची ठरतात.
अभिलेखागार :

  • ऐतिहासिक दस्तऐवज, कागदपत्रे, ग्रंथ, नकाशे, हस्तलिखिते, चित्रफिती अशी सर्व ऐतिहासिक माहिती ज्या ठिकाणी जतन करून ठेवलेली असते, त्या ठिकाणाला 'अभिलेखागार' असे म्हणतात.
  • अभिलेखागार शासन व जनतेला आवश्यकतेनुसार संदर्भ पुरवते. विश्वसनीय इतिहासलेखनासाठी अभिलेखागार महत्त्वाची भूमिका बजावतात.
  • भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली येथे असून ते आशियातील सर्वांत मोठे आहे.

तिकीट संग्राहक जाल कूपर :

  • जाल कूपर हे ख्यातनाम तिकीट संग्राहक होते.
  • त्यांनी भारतीय टपाल तिकिटांचा जागतिक स्तरावर अभ्यास केला.
  • 'इंडियाज स्टॅम्प जर्नल' चे संपादन, टपाल तिकीट ब्यूरोची स्थापना आणि 'एम्पायर ऑफ इंडिया फिलाटेलिक सोसायटी'ची निर्मिती हे त्यांचे महत्त्वाचे कार्य होते.
  • त्यांनी तिकीट संग्रहाच्या छंदाला शास्त्रीय रूप दिले आणि त्यावर पुस्तकेही लिहिली.
  • जाल कूपर यांनी यांबाबत केलेल्या कार्याचा गौरव म्हणून भारत सरकारने १९७७ साली 'जाल कूपर' हे टपाल तिकीट प्रसिद्ध केले.

भौतिक साधने :

  • वस्तू आणि वास्तू किंवा त्यांचे अवशेष यांना इतिहासाची 'भौतिक साधने' असे म्हणतात.
  • भौतिक साधनांवरून प्राचीन काळातील मानवाची प्रगती, त्याची आर्थिक स्थिती, राहणीमानाचा दर्जा इत्यादी बाबी माहीत होतात.
  • मानवाच्या कलेतील प्रगती, वास्तुकलेतील प्रगती व बांधकाम शैली इत्यादींविषयीची माहिती मिळते.
  • लेखनकला अवगत होण्यापूर्वीच्या मानवाचा इतिहास भौतिक साधनांमधूनच मिळवता येतो.

नाणी :

नाण्यांवरून इतिहासातील अनेक बाबींची माहिती होत असल्यामुळे नाणी ही इतिहासाच्या अभ्यासाची भौतिक साधने होऊ शकतात.

  • नाणी वा नोटांवर छापलेल्या चित्रांवरून तत्कालीन इतिहासाची माहिती होते.
  • नाण्यांवर छापलेल्या संदेशावरून त्या काळातील समस्या वा महत्त्वाचे विषय कोणते होते, याची माहिती मिळते.
  • नाण्यांचे धातू, त्यांचे आकार यांवरून त्या काळात वापरात असणारे धातू, छपाईची कला यांचा बोध होतो.
  • नाण्यांवर कोरलेल्या शब्दांवरून तत्कालीन लिपी आणि भाषा यांचा बोध होतो.
  • नाण्यांवर कोरलेल्या चित्रांवरून तत्कालीन चित्रकलेतील प्रगती व पद्धती यांची माहिती होते.
  • मुंबई येथे मुख्य कार्यालय असणारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भारत सरकारसाठी नोटा छापण्याचे काम करते.

संग्रहालये :

  • वस्तुसंग्रहालये म्हणजे वस्तू, हत्यारे, नाणी, शिल्पे यांचे कलात्मकतेने मांडलेले प्रदर्शनच होय.
  • संग्रहालयात ठेवलेल्या वस्तूंमुळे अभ्यासकाला त्या काळाचा अभ्यास करता येतो.
  • संग्रहालयाचे ऐतिहासिक संग्रहालय, कला वा शस्त्रास्त्र संग्रहालय, प्राणी संग्रहालय असे अनेक प्रकार पडतात.
  • प्रत्येक राज्यात आपल्या राज्याची वैशिष्टये सांगणारी संग्रहालये आहेत.
  • काही संग्राहक आपल्या आवडीच्या वस्तूंचा, मूर्तीचा वा शिल्पांचा संग्रह करीत असतात.
  • मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय प्रसिद्ध आहे.
  • रिझर्व्ह बँकेचे संग्रहालय पुणे येथे आहे.
  • इतिहासाच्या अभ्यासाच्या भौतिक साधनात अशी संग्रहालये महत्त्वाची असतात.

मौखिक साधने :

  • जे साहित्य पिढ्यान्पिढ्या मौखिक परंपरेने संक्रमित होत राहते, अशा साहित्याला 'मौखिक साधने' असे म्हणतात. मौखिक साहित्याचा कर्ता अज्ञात असतो.
  • ओव्या, म्हणी, पोवाडे, लोककथा, लोकगीते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे मौखिक पद्धतीने येत असतात.
  • या साहित्यातून तत्कालीन लोकजीवनाचे अनेक पैलू, विचार-आचार, रूढी, भाषा, पद्धती व्यक्त होतात; म्हणून अशा साहित्याला इतिहास लेखनाची 'मौखिक साधने' असे म्हटले जाते.
  • रामायण, महाभारतादी प्राचीन साहित्य प्रारंभीच्या काळात मौखिक परंपरेनेच जतन केले गेले. मौखिक साहित्य कालांतराने लिखित स्वरूपात येते.

दृक्-श्राव्य साधने :

  • आधुनिक तंत्र-विज्ञान युगात आकाशवाणी, दूरदर्शन, ध्वनिफिती, अनुबोधपट, आंतरजाल (इंटरनेट) अशी अनेक दृक्-श्राव्य साधने उपलब्ध झालेली आहेत.
  • अशा साधनांच्या आधारे आपल्याला विपुल माहिती मिळू शकते.
  • घटना घडत असतानाची दृश्ये कॅमेऱ्यात टिपता येतात.
  • अनेक वृत्तपटातून व अनुबोधपटातून इतिहास उलगडत जातो. अशा आधुनिक साधनांना 'दृक्-श्राव्य साधने' असे म्हणतात.

फिल्म ॲण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) :

  • भारत सरकारने १९६० साली पुणे येथे FTII ची स्थापना केली.
  • लोकशिक्षणाबरोबरच चित्रपटनिर्मितीसाठी आवश्यक असलेले सर्व प्रकारचे प्रशिक्षण या संस्थेत दिले जाते.

इंडियन न्यूज रिव्ह्यू :

  • राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा, संस्कृती अशा विविध क्षेत्रांतील महत्त्वाच्या घटनांवर या संस्थेने वृत्तपट तयार केले आहेत.
  • नेते, समाजासाठी व देशासाठी योगदान देणाऱ्या व्यक्ती, तसेच देशातील महत्त्वाची ठिकाणे यांवर अनुबोधपट (डॉक्युमेंटरीज् फिल्मस्) बनवले आहेत.
  • असे वृत्तपट आणि अनुबोधपट ही आधुनिक इतिहासाची दृक्-श्राव्य साधने आहेत.

दृक्-श्राव्य माध्यमाचे महत्त्व :

  • दूरदर्शन, चित्रपट, आंतरजाल (इंटरनेट), माहितीपट अशा दृक्-श्राव्य साधनांमुळे चालू असणाऱ्या घटनांचे चित्रीकरण करता येते.
  • राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा, महोत्सव, ऐतिहासिक वास्तू या सर्वांचे चित्रीकरण झाल्याने त्या घटना आपल्याला पुन्हा पुन्हा पाहता व ऐकता येतात.
  • वृत्तपट व अनुबोधपट यांमुळे इतिहास पुन्हा जिवंत होतो व तो इतिहासलेखनाला उपयुक्त ठरतो.
  • म्हणून आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी दृक्-श्राव्य माध्यमे महत्त्वाची असतात.

दृक्-श्राव्य साधनांचा वापर करताना घ्यावयाची काळजी :

  • इतिहास हा जीवनातील सर्व अंगांना स्पर्श करणारा असल्याने दृक्-श्राव्य साधनांचा वापर करताना त्यांचे जतन आणि वापर यांची खूप काळजी घ्यावी लागते.
  • आधुनिक इतिहास लेखनात दृक्-श्राव्य माध्यमांचा आणि आंतरजालावरील माहितीचा उपयोग केला जातो. मात्र, आंतरजालावर माहिती सहज उपलब्ध असली तरी तिची सत्यता तपासणे अत्यावश्यक आहे, कारण कोणीही ती माहिती टाकू शकतो. म्हणूनच ती माहिती सत्य आहे की नाही, याची काळजी घेऊनच तिचा वापर करायला हवा.
  • त्यामुळे इतिहास लेखनात ती काळजीपूर्वक वापरणे गरजेचे असते.

लेखन साधनांचे जतन :

  • इतिहास हा मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारा असल्याने तो महत्त्वपूर्ण आहे. म्हणून या इतिहासाच्या सर्व साधनांची आपण जपणूक केली पाहिजे.
संदर्भग्रंथ 'INDIA 2000' :

  • भारत सरकारच्या प्रकाशन विभागातून प्रसिद्ध होणाऱ्या वार्षिक ग्रंथांमधील माहिती अत्यंत विश्वसनीय असते.
  • 'INDIA 2000' या संदर्भग्रंथात विविध क्षेत्रांतील – जसे की राजकारण, संरक्षण, विज्ञान, आरोग्य, शिक्षण, अर्थव्यवस्था वगैरे – घडामोडींचा सविस्तर आढावा दिला आहे. अशा ग्रंथांच्या आधारे आधुनिक इतिहासाचे लेखन प्रभावीपणे करता येते.
PDF of this Chapter

Rs 8

-Kitabcd Academy Offer-

To Buy Notes(Rs.5)+ Solution(Rs.5) PDF of this chapter
Price : Rs.10 / Rs.8

Click on below button to buy PDF in offer (20% discount)

Click on link to get PDF from store

PDF : इयत्ता नववी- इतिहास-पाठ-१ : इतिहासाची साधने - नोट्स

PDF : इयत्ता नववी- इतिहास-पाठ-१ : इतिहासाची साधने - स्वाध्याय प्रश्नोत्तरे

Leave a Reply

Leave you Replay.... Your email address will not be published. Required fields are marked *