भारत : १९६० नंतरच्या घडामोडी
महाराष्ट्र बोर्ड-इयत्ता नववी- इतिहास-पाठ-2
नोट्स
अभ्यासघटक :
|
स्वातंत्र्योत्तर भारत :
नियोजन आयोगाची गरज :
- भारताने १९५० साली संविधानाचा स्वीकार करून सार्वभौम लोकशाही राष्ट्राची स्थापना केली.
- ब्रिटिश राजवटीचे भारताच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झाले होते. भारतीय उद्योगांचा व्हास झाला होता.
- विविध भाषा, धर्म आणि जातींनी समृद्ध असलेल्या या देशाला अनेक सामाजिक, आर्थिक आणि राजकीय आव्हाने भेडसावत होती.
- भारताची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी देशातील दुर्बल घटकांच्या विकासासाठी विविध योजना राबवण्याची गरज होती.
- अनेक उद्योग उभारून, आधुनिकीकरण करून, भारताला स्वावलंबी बनवणे गरजेचे होते.
- नियोजनाद्वारे सामाजिक न्यायावर आधारलेली अर्थव्यवस्था अस्तित्वात आणायची होती; म्हणून स्वातंत्र्यानंतर १९५० साली दारिद्र्य निर्मूलन व आर्थिक वाढीसाठी भारताने नियोजन आयोगाची स्थापना करून औद्योगिकीकरणाला चालना दिली.
- निवडणुका यशस्वीपणे पार पाडल्या गेल्या, ज्यामुळे लोकशाही परंपरांचा पाया मजबूत झाला आणि देशात राजकीय स्थैर्य निर्माण झाले.
- भारताच्या प्रगतीसाठी घेतलेली ही पावले देशाच्या लोकशाही आणि सामाजिक सुधारणांसाठी महत्त्वाची ठरली.
सार्वभौम राष्ट्र :
|
१९६० चे दशक :
- १९६० च्या दशकात भारताच्या राजकीय परिस्थितीवर महत्त्वपूर्ण प्रभाव पडणाऱ्या अनेक घडामोडी घडल्या.
- पोर्तुगालच्या राजवटीखालील गोवा, दमण आणि दीव यांच्या मुक्ततेनंतर, हे प्रदेश भारतीय संघराज्यात समाविष्ट झाले.
- त्याच कालखंडात भारत-चीन सीमावर्ती तणाव वाढत गेला आणि अखेरीस १९६२ मध्ये युद्ध झाले, जे मुख्यतः मॅकमोहन रेषेच्या क्षेत्रात घडले.
- या घटनांनी भारताच्या राजकीय, सामरिक आणि परराष्ट्र धोरणांवर दीर्घकालीन प्रभाव टाकला.
- या दशकाने भारताच्या राजकीय इतिहासात महत्त्वपूर्ण वळण आणले आणि राष्ट्रीय सुरक्षेसोबतच प्रदेशवाद आणि आंतरराष्ट्रीय संबंधांवर प्रभाव टाकला.
१९६० चे दशक या कालावधीतील प्रधानमंत्री व त्याकाळात भारतात घडलेल्या महत्त्वाच्या घटना :
पंडित जवाहरलाल नेहरू (१९४७ ते १९६४) :
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळात प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरूंनी भारताचे नेतृत्व केले. या काळात भारतात अनेक महत्त्वपूर्ण घटना घडल्या, ज्या देशाच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक विकासावर प्रभाव टाकणाऱ्या ठरल्या.
या काळात भारताने औद्योगिकीकरण, विज्ञान आणि तंत्रज्ञान, शिक्षण आणि आंतरराष्ट्रीय संबंध यामध्ये मोठी प्रगती केली. नेहरूंनी गुटनिरपेक्ष चळवळीचे नेतृत्व केले आणि भारताच्या आर्थिक नियोजनाला दिशा दिली.
काही प्रमुख घटना पुढीलप्रमाणे आहेत:
- १९४७ : भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि नेहरू देशाचे पहिले पंतप्रधान झाले.
- १९५०: भारतीय संविधानाची अंमलबजावणी झाली आणि भारत गणराज्य बनला.
- १९५६: राज्य पुनर्रचना कायद्यानुसार भाषावार प्रांतरचना करण्यात आली.
- १९६१: गोवा, दमण आणि दीव पोर्तुगालच्या राजवटीतून मुक्त झाले आणि भारताचा भाग बनले.
- १९६२: भारत-चीन युद्ध झाले, ज्यामुळे देशाच्या संरक्षण धोरणात मोठे बदल घडले.
- दारिद्र्यावर मात करण्यासाठी त्यांच्याच नेतृत्वाखाली नियोजन आयोगाची निर्मिती होऊन 'पंचवार्षिक नियोजनाच्या मार्गाने विकास' हे धोरण ठरवण्यात आले.
- पंडित नेहरू हे 'भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार' होत.
- १९६४ साली भारताचे प्रधानमंत्री पं. नेहरू यांचे निधन झाले
लालबहादूर शास्त्री (१९६४ ते १९६६) :
जून १९६४ ते जानेवारी १९६६ अशा १८ महिन्यांच्या कालावधीत लालबहादूर शास्त्री हे भारताचे प्रधानमंत्री होते. त्यांच्या राजवटीची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे-
- शास्त्रीजींनी 'जय जवान, जय किसान' ही घोषणा दिली.
- त्यांच्या या घोषणेमुळे देशाला भारतीय शेतकऱ्यांचे आणि भारतीय सैनिकांचे महत्त्व पटवून दिले.
- त्यांच्याच काळात १९६५ मध्ये भारत व पाकिस्तान यांच्यात युद्ध होऊन पाकिस्तानचा पराभव झाला होता.
- शास्त्रीजींच्याच काळात रशियाच्या मध्यस्थीने भारत व पाकिस्तान यांच्यात ताश्कंद येथे करार झाला.
- १९६६ मध्ये ताश्कं द येथे लालबहादूर शास्त्रींचे निधन झाले.
इंदिरा गांधी (१९६६ ते १९७७ आणि १९८० ते १९८४) :
१९६६ ते १९७७ आणि १९८० ते १९८४ या जवळपास १६ वर्षांच्या काळात इंदिरा गांधी या भारताच्या प्रधानमंत्री होत्या.
या काळात देशात पुढील महत्त्वाच्या घटना घडल्या-
- १९ जुलै १९६९ रोजी १४ बँकांचे राष्ट्रीयीकरण झाले.
- भारतातील सर्व संस्थानिकांचे तनखे रद्द झाले.
- पूर्व पाकिस्तानातून कोट्यवधी निर्वासित भारतात आले. हा प्रश्न सोडवताना भारताचे पाकिस्तानशी १९७१ साली युद्ध झाले.
- भारताने शांततेसाठी १९७४ साली राजस्थानमधील पोखरण येथे जमिनीखाली अणुचाचणी केली.
- १९७५ साली सिक्कीममध्ये सार्वमत घेऊन ते भारतीय संघराज्यात सामील केले.
- १९७५ साली इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी जाहीर करून नागरिकांचे मूलभूत हक्क स्थगित केले.
- १९८४ साली अमृतसर येथील सुवर्णमंदिरात लष्कर घुसवून अतिरेक्यांना कंठस्नान घालून खलिस्तानी चळवळीचे कंबरडे मोडले.
- त्यांच्याच काळात ईशान्येकडील राज्यांत उल्फा या संघटनेने मोठे आंदोलन उभे केले.
- १९८४ मध्ये श्रीमती इंदिरा गांधींच्या सुरक्षा रक्षक पथकातील रक्षकांनीच त्यांची हत्या केली.
१९७० चे दशक :
१९७० चे दशक या कालावधीतील प्रधानमंत्री व त्याकाळात भारतात घडलेल्या महत्त्वाच्या घटना :
मोरारजी देसाई (१९७७ ते १९७९) :
- आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर अनेक विरोधी पक्षांनी एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना केली.
- काँग्रेसचा पराभव करून १९७७ साली मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाचे सरकार अधिकारावर आले.
- परंतु, या पक्षातील अंतर्गत कलह आणि मतभेद विकोपाला गेले.
- या मतभेदांमुळे मोरारजी देसाई यांना राजीनामा द्यावा लागला; त्यामुळे त्यांचे सरकार अल्पकाळ म्हणजे जेमतेम २८ महिनेच टिकले.
चरणसिंग (१९७९-१९८०) :
- फक्त ५ महिने प्रधानमंत्री, अल्पकाळ सत्ता.
१९८० चे दशक :
- १९८० च्या दशकात पंजाबमध्ये 'खलिस्तान' आंदोलन सुरू झाले.
- भारतीय संघराज्यातून बाहेर पडून वेगळ्या स्वतंत्र 'खलिस्तान' राज्याच्या मागणीसाठी पंजाबमध्ये काही गटांनी आंदोलन सुरू केले.
- या आंदोलनाला पाकिस्तानने पाठिंबा दिल्यामुळे हे आंदोलन अधिकच उग्र झाले.
- या आंदोलनातील अतिरेक्यांनी अमृतसर येथील सुवर्ण मंदिर या शिखांच्या प्रार्थनास्थळाचा आश्रय घेऊन हिंसाचार सुरू केला. या अतिरेक्यांचा निःपात करण्यासाठी सुवर्ण मंदिरात लष्कर पाठवावे लागले.
१९८० चे दशक या कालावधीतील प्रधानमंत्री व त्याकाळात भारतात घडलेल्या महत्त्वाच्या घटना :
राजीव गांधी (१९८४ ते १९८९) :
- ईशान्येकडील राज्यांत 'उल्फा' या संघटनेचे आंदोलन,
- विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सुधारणा-अर्थव्यवस्थेला गती.
- श्रीलंकेतील तमिळ अल्पसंख्याकांच्या समस्या-त्यांच्या स्वायत्ततेला पाठिंबा.
- बोफोर्स तोफा खरेदीत भ्रष्टाचाराचे आरोप-काँग्रेसचा पराभव.
- श्रीलंकेतील 'लिट्टे' या संघटनेने त्यांची हत्या केली.
विश्वनाथ प्रताप सिंग (१९८९ ते १९९०) :
- जेमतेम ११ महिने प्रधानमंत्री.
- इतर मागास वर्गीयांसाठी (OBC) आरक्षण लागू केले.
- शेतकऱ्यांना सरसकट १० हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली.
चंद्रशेखर (१९९० ते १९९१) :
- परकीय कर्जाचा बोजा वाढला; त्यामुळे सरकारी तिजोरीतील सोने गहाण ठेवावे लागले.
- परकीय चलनसाठा संपुष्टात आला.
- राष्ट्रीय उत्पन्न घटले.
- परकीय चलनातील ठेवी अनिवासी भारतीय काढून घेऊ लागले.
- देशाची आर्थिक अवस्था बिकट झाली होती.
१९९१ नंतरचे बदल :
१९९१ साली जगात आणि भारतात पुढील महत्त्वपूर्ण घटना घडल्या-
- सोव्हिएत युनियनचे विघटन झाल्याने जगातील शीतयुद्धाला पूर्णविराम मिळाला.
- पी. व्ही. नरसिंहराव मंत्रिमंडळाने आर्थिक उदारीकरणाचे धोरण स्वीकारले.
- उदारीकरणाच्या धोरणामुळे भारताची आर्थिक व्यवस्था भरभराटीस आली.
- याच काळात रामजन्मभूमीचा व बाबरी मशिदीचा प्रश्न ऐरणीवर येऊन त्याचे देशावर दीर्घकाळ परिणाम झाले.
१९९१ नंतरचे प्रधानमंत्री व त्याकाळात भारतात घडलेल्या महत्त्वाच्या घटना :
पी. व्ही. नरसिंहराव (१९९१ ते १९९६) :
- आर्थिक उदारीकरणाचा स्वीकार.
- जागतिकीकरणाच्या धोरणामुळे आर्थिक भरभराट.
- रामजन्मभूमीचा आणि बाबरी मशिदीचा प्रश्न उग्र बनला.
एच. डी. देवेगौडा (१९९६ ते १९९७) :
- अल्पकाळ सत्ता. फक्त १० महिने प्रधानमंत्री होते.
इंदरकुमार गुजराल (१९९७ ते १९९८) :
- फक्त ११ महिने प्रधानमंत्रिपदी होते.
अटलबिहारी वाजपेयी (१९९८ ते २००४) :
- अटलबिहारी वाजपेयी १९९८ ते २००४ या कालावधीत भारताचे प्रधानमंत्री होते.
- त्यांनी पाकिस्तानबरोबर मैत्रीचा संवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
- त्यांच्याच काळात भारत व पाकिस्तान या दरम्यान रेल्वे व बससेवा सुरू झाली. परंतु त्यांचे हे प्रयत्न अयशस्वी ठरले.
- १९९९ मध्ये कारगिल क्षेत्रात पाकिस्तानने आक्रमण केल्यामुळे दोन्ही देशांत युद्ध होऊन पाकिस्तानचा पराभव झाला.
- वाजपेयींच्या प्रधानमंत्रिपदाच्या काळातच १९९८ मध्ये भारताने राजस्थानमधील पोखरण येथे काही अणुचाचण्या घेऊन स्वतःला 'अण्वस्त्रधारी देश' म्हणून घोषित केले.
भारतीय अर्थव्यवस्था :
स्वातंत्र्योत्तर काळातील भारतीय अर्थव्यवस्थेची उद्दिष्टे :
- अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण.
- आर्थिक स्वावलंबन.
- सामाजिक न्याय.
- समाजवादी समाजरचना.
समाजवादी समाजरचना :
|
पंचवार्षिक योजना :
- उद्योगधंदे उभारून आधुनिकीकरण आणि स्वावलंबन प्राप्त करणे, हे भारताचे उद्दिष्ट होते.
- नियोजनाद्वारे सामाजिक न्यायावर आधारलेली अर्थव्यवस्था आणायची होती.
- भारताने नियोजन आयोगाची स्थापना करून पंचवार्षिक योजना पद्धती सुरू केली.
आर्थिक उदारीकरण :
- नरसिंहराव सरकारने १९९१ साली आर्थिक उदारीकरणाचे धोरण स्वीकारले.
- या धोरणामुळे झालेल्या बदलांना 'जागतिकीकरण' असेही म्हणतात.
आर्थिक उदारीकरणाच्या धोरणाचे परिणाम :
- भारताची आर्थिक व्यवस्था भरभराटीस आली.
- भारतातील परकीय गुंतवणूक वाढली.
- वैज्ञानिक क्षेत्रातील प्रगतीमुळे अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत झाली.
- माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या.
विज्ञान आणि तंत्रज्ञान :
हरितक्रांती :
- भारतात १९६५ मध्ये हरितक्रांतीच्या चळवळीला सुरुवात झाली.
- डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना 'हरितक्रांतीचे जनक' म्हणतात.
- नव्या शास्त्रीय तंत्राचा वापर करून त्यांनी अन्नधान्याचे उत्पादन वाढवले.
धवलक्रांती :
- डॉ. वर्गीस कुरियन यांची गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील आणंद येथे दुग्धप्रकल्प बोर्डावर नियुक्ती झाली.
- सहकाराच्या माध्यमातून व व्यावसायिक दृष्टी समोर ठेवून हा दुग्धप्रकल्प विकसित केला गेला.
- डॉ. वर्गीस कुरियन यांच्या या प्रयोगाने भारतात दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढून दूध-उत्पादनात जगाच्या अग्रस्थानी असणाऱ्या देशांत भारताची गणना होऊ लागली.
- डॉ. कुरियन यांनी दूध उत्पादन क्षेत्रात ही 'धवलक्रांती' घडवून आणली.
अणुशक्ती :
- शांततेसाठी अणू ऊर्जेचा वापर करण्याचे भारताचे सुरुवातीपासूनच धोरण राहिलेले आहे.
- डॉ. होमी भाभा यांनी भारतातील अणुशक्ती कार्यक्रमाचा पाया घातला.
- १९७४ साली भारताने प्रथमच अणुचाचण्या केल्या. त्यानंतर १९९८ साली आणखी अणुचाचण्या करून भारत अण्वस्त्रधारी देश बनला.
- भारताने अणुशक्तीचा वापर वीजनिर्मिती, औषधे, संशोधन आणि संरक्षण साहित्याची निर्मिती यांसाठी केला.
अवकाश :
- १९७५ साली भारताने 'आर्यभट्ट' हा पहिला उपग्रह अवकाशात सोडला.
- यशस्वीपणे अवकाश कार्यक्रम योजना आखून भारताने पुढे अनेक उपग्रह अवकाशात सोडले. दूरसंचार क्षेत्रात प्रगती केली.
सामाजिक क्षेत्रातील बदल :
महिला सक्षमीकरण :
- महिला, बालके व वंचित घटकांच्या विकासासाठी भारताने विविध योजना आखल्या.
- मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अंतर्गत महिला आणि बालविकास विभाग निर्माण केला गेला.
- स्त्रियांना सामाजिक न्याय मिळण्यासाठी हुंडा प्रतिबंधक कायदा, समान वेतन कायदा असे कायदे संमत केले.
- संविधान दुरुस्ती करून स्थानिक शासनसंस्थांमध्ये स्त्रियांसाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या.
मागास वर्गांचे हित :
- समाजातील वंचितांच्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी 'काकासाहेब कालेलकर आयोगा 'नी स्थापना झाली.
- इतर मागास वर्गाच्या समस्यांवर विचार करण्यासाठी १९७८ मध्ये बी. पी. मंडल आयोगाची स्थापना झाली.
- विविध सेवा व संस्थांमध्ये आरक्षणाचे धोरण स्वीकारण्यात आले.
- मागास जातींच्या प्रतिष्ठेसाठी दलित अत्याचारविरोधी कायदा (अॅट्रॉसिटी अॅक्ट) संमत केला.
जागतिकीकरण :
'जागतिकीकरण' म्हणजे जगातील सर्व राष्ट्रांची मिळून एक बाजारपेठ निर्माण करणे होय. म्हणजेच 'जागतिक अर्थव्यवस्था' निर्माण करणे होय.
- जागतिकीकरणामुळे आपल्या राष्ट्राशिवाय जगातील कोणत्याही देशाशी कोणालाही व्यापार करणे शक्य झाले. व्यापारावरील नियंत्रणे नष्ट झाली, आर्थिक उदारीकरण घडून आले.
- उद्योग-व्यवसायात अधिक गुंतवणूक होऊन त्यांचा विस्तार झाला. रोजगाराच्या नव्या संधी निर्माण झाल्या.
- जागतिकीकरणाने अर्थकारण, राजकारण, विज्ञान व तंत्रज्ञान, समाज व संस्कृती अशा सर्वच क्षेत्रांत बदल घडून आले.
जागतिक संघटनात भारताचा सहभाग :
- स्वातंत्र्यानंतर भारत विविध क्षेत्रांत प्रगती करून जागतिक पातळीवर महत्त्वाचा देश ठरला आहे.
- भारत G20, BRICS अशा आंतरराष्ट्रीय संघटनांचा सभासद आहे.
- BRICS - ब्राझील, रशिया, भारत, चीन व दक्षिण आफ्रिका हे 'ब्रिक्स' या संघटनेचे सभासद देश आहेत.
Click on link to get PDF from store
PDF : इयत्ता नववी- इतिहास-पाठ-२ : भारत : १९६० नंतरच्या घडामोडी - नोट्स
PDF : इयत्ता नववी- इतिहास-पाठ-२ : भारत : १९६० नंतरच्या घडामोडी - स्वाध्याय प्रश्नोत्तरे
Useful links :
Main Page : - Maharashtra Board इयत्ता नववी- इतिहास व राज्यशास्त्र -Marathi Medium - All chapters notes, solutions, videos, test, pdf.
Previous Chapter : धडा १ : इतिहासाची साधने - online Notes Next Chapter : धडा ३ : भारतापुढील अंतर्गत आव्हाने - online Notes |