भारतापुढील अंतर्गत आव्हाने
महाराष्ट्र बोर्ड-इयत्ता नववी- इतिहास-पाठ-३
नोट्स
अभ्यासघटक :
|
पंजाबमधील असंतोष :
'आनंदपूर साहिब' ठराव :
पंजाब राज्यात अकाली दल हा प्रमुख राजकीय पक्ष होता. १९७३ मध्ये अकाली दलाने 'आनंदपूर साहिब' ठराव मंजूर करून पंजाबला अधिक स्वायत्तता आणि हक्क मिळावेत, यासाठी विविध मागण्या केल्या. यामध्ये
- चंदीगढ पंजाबला देणे,
- पंजाबी भाषिक प्रांत पंजाबमध्ये समाविष्ट करावेत,
- शिखांना सैन्यात अधिक प्रतिनिधित्व देणे
- पंजाब राज्यास अधिक स्वायत्तता द्यावी.
इत्यादींचा समावेश होता.
१९७७ मध्ये सत्तेवर आल्यानंतर अकाली दलाने जुन्या मागण्यांबरोबर नदी पाणीवाटपात न्याय मिळवण्याची आणि अमृतसरला पवित्र शहराचा दर्जा देण्याची मागणी केली.
पंजाबातील असंतोष :
- १९८० मध्ये पंजाबमध्ये 'स्वतंत्र खलिस्तान' चळवळ सुरू झाली.
- अकाली दलाचे नेते संत हरचरणसिंग लोंगोवाल सुवर्ण-मंदिरात बसून कार्यकर्त्यांना चळवळीचे मार्गदर्शन करीत असत.
- जर्नेलसिंग भिंद्रानवाले हा कट्टर खलिस्तानवादी व त्याचे अनुयायी सशस्त्र दहशतवादी कारवाया करीत होते.
- १९८१ मध्ये संपादक लाला जगत्नारायण यांच्या खून प्रकरणात भिंद्रानवाले याला केलेल्या अटकेमुळे पंजाबातील परिस्थिती बिघडली.
- त्यामुळे १९८३ मध्ये पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.
ऑपरेशन ब्लू स्टार :
- सुवर्णमंदिर परिसरातील अकाल तख्त येथे आश्रय घेतलेल्या भिंद्रानवाले याने सुवर्णमंदिराचा ताबा घेऊन दहशतवादी कारवाया सुरू केल्या.
- या दहशतवाद्यांना सुवर्णमंदिरातून बाहेर काढण्याची जबाबदारी मेजर जनरल कुलदीपसिंग ब्रार यांच्यावर सोपवण्यात आली.
- ३ जून ते ६ जून १९८४ या कालावधीत सुवर्णमंदिरात जी लष्करी कारवाई झाली, तिला 'ऑपरेशन ब्लू स्टार' असे म्हणतात.
- या कारवाईत भिंद्रानवालेसह अनेक दहशतवादी मारले गेले.
- १९८६ मध्ये पुन्हा 'ऑपरेशन ब्लॅक थंडर' कारवाई करून सुवर्णमंदिरातील दहशतवादयांना मारले गेले.
- या कारवाईमुळे पंजाब प्रांतात खलिस्तानवादी चळवळ थंडावून हिंसाचार कमी झाला व राज्यात शांतता प्रस्थापित झाली.
ईशान्य भारत समस्या :
- आसाम, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मेवालय, मिझोरम, मणिपूर व त्रिपुरा ही सध्याची आठ राज्ये ईशान्य भारतात आहेत.
- वंश, भाषा, संस्कृती यांची विविधता असणाऱ्या या जनजातींना भारताच्या मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे होते.
- पंडित नेहरूंनी १९५४ मध्ये नेफा (नॉर्थ-ईस्ट फ्रंटियर एजन्सी म्हणजेच पूर्वांचल) असा विभाग निर्माण केला.
- संविधानाच्या सहाव्या अनुसूचीमध्ये या विभागाविषयी खास तरतुदी करण्यात आल्या.
- १९६५ मध्ये या विभागाची जबाबदारी परराष्ट्र मंत्रालयाकडे सोपवण्यात आली.
ईशान्यीय परिषद कायदा :
१९७१ च्या कायद्याने ईशान्यीय परिषदेवर केंद्र सरकारला पुढील बाबतींत सल्ला देण्याचे काम सोपवले गेले-
- सामाजिक व आर्थिक क्षेत्रांतील समान हिताच्या बाबी.
- आंतरराज्य वाहतूक.
- वीज व पूर नियंत्रण.
मिझोरम :
- मिझोबहुल लुशाई टेकड्यांच्या भागातील जिल्ह्यांना सरकारने प्रशासकीय स्वायत्तता दिली.
- भाषावार प्रांतरचना आयोग नेमल्यावर स्वायत्त मिझो प्रांताची मागणी सुरू झाली.
- १९५९ मध्ये मिझो प्रदेशात पडलेल्या दुष्काळात लोकांना मदत करणाऱ्या लालडेंगा यांनी १९६१ मध्ये 'मिझो नॅशनल फ्रंट'ची स्थापना केली.
- ग्रेटर मिझोरमची मागणी करणाऱ्या या संघटनेने १९६६ साली 'स्वतंत्र मिझोरम' राष्ट्राची घोषणा केली.
- इंदिरा गांधी यांनी ही परिस्थिती कठोरपणे हाताळून १९७२ मध्ये मिझोबहुल भागाला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला.
- १९८५ मध्ये राजीव गांधी व मिझो नॅशनल फ्रंट यांच्यात तडजोड होऊन मिझोरमला घटकराज्याचा दर्जा मिळाला व लालडेंगा राज्याचे मुख्यमंत्री झाले.
नागालँड :
- पूर्व हिमालय, नागा टेकड्या, आसाम व म्यानमारचा सीमावर्ती भाग या परिसरांत नागा जमातीची वस्ती होती.
- १९४६ साली स्वतंत्र राष्ट्राच्या मागणीसाठी नागा युवकांनी अंगामी झापू फिझो यांच्या नेतृत्वाखाली 'नागा नॅशनल कौन्सिल' (NNC) या संघटनेची स्थापना केली.
- या संघटनेने स्वतंत्र नागालँड राष्ट्राची मागणी केली.
- १९५४ मध्ये NNC संघटनेने स्वतंत्र नागालँडच्या स्थापनेची घोषणा केली.
- लष्करी कारवाईनंतर NNC व केंद्र सरकार यांच्यात वाटाघाटी होऊन नागाबहुल भागाला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाला.
- १ डिसेंबर १९६३ रोजी नागालँड घटकराज्य अस्तित्वात आले.
आसाम :
- आसाममध्ये बंगाली भाषक स्थलांतरितांचे वर्चस्व वाढत होते. बांग्लादेशी घुसखोरांमुळे स्थानिकांमध्ये मोठा असंतोष होता.
- ऑल स्टुडंट्स युनियन आणि आसाम गणसंग्राम परिषद यांनी या घुसखोरांविरुद्ध उग्र आंदोलन उभारले.
- १९८५ साली प्रधानमंत्री राजीव गांधी आणि आसामी नेते प्रफुल्लकुमार महन्तो यांच्यात करार झाला.
- या कराराप्रमाणे बांग्लादेशी नागरिकांना आसामबाहेर घालवण्याचे ठरले व विधानसभेच्या निवडणुका घेण्यात आल्या.
- १९८६ साली विधानसभेच्या निवडणुका होऊन महन्तो मुख्यमंत्री झाले.
- या लोकशाही प्रक्रियेमुळे आसामात शांतता प्रस्थापित करण्यात यश आले.
अरुणाचल प्रदेश :
- १९५४ मध्ये नेफा विभागाची निर्मिती झाली होती, त्यालाच १९७२ साली अरुणाचल प्रदेश म्हणजे 'उगवत्या सूर्याचा देश' असे म्हटले जाऊ लागले.
- २० फेब्रुवारी १९८७ रोजी अरुणाचलला घटकराज्याचा दर्जा मिळाला.
१९६० ते २००० या कालखंडात ईशान्य भारतात लोकशाही अधिक प्रगल्भ झाली. केंद्र सरकारच्या विशेष योजना, औद्योगीकरण आणि शिक्षणाच्या प्रसारामुळे हा भाग हळूहळू विकासाच्या मार्गावर पुढे जाऊ लागला.
नक्षल वाद :
नक्षलवादी चळवळ :
- पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यातील नक्षलबारी येथील घटनेतून ही चळवळ सुरू झाली.
- अल्पभूधारक शेतकरी व शेतमजुरांना संघटित करून काही शेतजमिनींभोवती लाल झेंडे रोवून नक्षलवाद्यांनी तो भाग मुक्त प्रदेश म्हणून घोषित केला.
- या घटनेतून प्रेरित होऊन पुढे ज्या चळवळी झाल्या, त्यांना 'नक्षलवादी चळवळी' असे म्हणतात.
नक्षलवादी चळवळीची उद्दिष्टे :
- जमीनदारांच्या आर्थिक शोषणाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी कृषी समित्या स्थापन करणे.
- मोठ्या जमीनदारांच्या जमिनी बळकावणे.
- बळकावलेल्या जमिनींचे कुळांमध्ये वाटप करणे.
सुरक्षेला आव्हान :
- नक्षलवादी चळवळ सुरुवातीच्या उद्दिष्टांपासून भरकटली. जमीनदारांच्या शोषणाविरुद्ध सुरू झालेली नक्षलवादी चळवळ शेतकरी-मजुरांच्या हिताच्या उद्दिष्टांपासून लांब जाऊ लागली.
- नक्षलवादी शासनाचे उपक्रम व लोककल्याणकारी योजना सामान्य लोकांपर्यंत जाऊ देत नाहीत.
- दहशतवादाचा मार्ग स्वीकारून त्यांनी शासनाशी समांतर व्यवस्था निर्माण केली.
- नक्षलवाद्यांचा हा हिंसक दहशतवाद देशाच्या अंतर्गत सुरक्षेपुढे आव्हान ठरू लागला
- पश्चिम बंगालमध्ये सुरू झालेली ही चळवळ आता महाराष्ट्र, तेलंगणा, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, ओडिशा, आंध्र प्रदेश या राज्यांत पोहोचली आहे.
- नक्षलवाद्यांनी 'पीपल्स लिबरेशन गुरिला आर्मी' (PLGA) ही सशस्त्र संघटना स्थापन केली आहे.
जमातवाद :
- धर्माच्या अभिमानाचा अतिरेक दुरभिमानात होतो. आपलाच धर्म श्रेष्ठ व अन्य धर्म कनिष्ठ वाटू लागतात. या धर्मांधतेलाच 'जमातवाद' असे म्हणतात.
- संकुचित धार्मिक अभिमानातून जमातवाद निर्माण होतो.
धर्मांधतेचे परिणाम :
- राष्ट्रीय हिताचा विसर पडतो.
- एकमेकांवरचा विश्वास उडून परस्परांविषयी संशय वाढतो.
- परधर्मीय शत्रू लेखले जाऊन त्यांच्याकडे बघण्याची दृष्टी कलुषित होते. सामाजिक ऐक्य नष्ट होते.
- एकमेकांच्या सण-उत्सवांत सहभागी होण्याचे प्रमाण घटते.
- न्याय्य हक्कांच्या मागण्यांसाठीही लोक एकत्र येत नाहीत.
- छोट्याशा कारणाने दंगली होऊन जीवित व वित्तहानी होते
जमातवाद वाढीची कारणे :
- आर्थिक वा सामाजिक प्रश्नांचाही विचार धार्मिक दृष्टिकोनातून केला जातो.
- विशिष्ट धर्माचे असल्याने आपण राजकारणात प्रभावहीन असल्याची जाणीव होते.
- आपल्याच धर्माच्या लोकांवर सतत अन्याय होत असल्याची भावना बळावते.
- सरकारही आपल्या धर्माबाबत पक्षपात करते, असे वाटत राहते.
- आपल्या धर्माबाबत वा धर्म प्रतीकांबाबत कोणी काही बोलले तरी त्यातून दंगली पेटतात.
जमातवाद केव्हा नष्ट होईल?
- भिन्नधर्मीय लोक एकमेकांत मिसळले पाहिजेत.
- परस्परांच्या सण-उत्सवांत सहभागी झाले पाहिजेत.
- एकमेकांच्या चांगल्या चालीरिती, सद्विचार स्वीकारले पाहिजेत.
- आपल्या सामाजिक-आर्थिक प्रश्नांकडे धार्मिक दृष्टिकोनातून नव्हे; तर तर्कशुद्ध पद्धतीने पाहता आले पाहिजे.
जमातवाद नष्ट होण्याचे फायदे :
- माणसामाणसांत विश्वास निर्माण होऊन सामाजिक ऐक्य साधेल.
- सामाजिक ऐक्यातून राष्ट्रीय ऐक्य निर्माण होईल.
- दंगलींमुळे होणारी जीवित व वित्तहानी टळून देशात शांतता प्रस्थापित होईल.
प्रदेशवाद
- आपल्या प्रदेशाविषयी अवाजवी अभिमान बाळगणे म्हणजे 'प्रदेशवाद' होय.
- विकासातील असमतोलातून प्रदेशवादाला खतपाणी घातले जाते.
- आपल्या प्रदेशाचा इतिहास, संस्कृती श्रेष्ठ असल्याने आपली प्रगती झाली, असा श्रेष्ठत्वाचा गंड प्रगत राज्यांत निर्माण होतो.
- हे लोक अविकसित राज्यांतील लोकांना कमी लेखून, आपल्या विकासाच्या लाभात त्यांना सहभागी करून घ्यायला तयार होत नाहीत.
- याउलंट प्रादेशिक अस्मिता जागवून अविकसित भागातील लोक संघटित होतात.
- स्थानिक परंपरा, संस्कृती यांचा नको तेवढा गौरव करून आपले वेगळेपण ते सिद्ध करीत राहतात. यांतून प्रगत आणि अप्रगत राज्यांत प्रदेशवाद बळावतो.
प्रदेशवाद वाढीचे तोटे :
- अविकसित प्रदेश शैक्षणिक व नागरी सुविधांबाबतीत खूपच मागे पडतात.
- या भागातील जनतेला विकासाच्या संधी मिळत नाहीत.
- शैक्षणिक मागासलेपण, बेरोजगारी, दारिद्र्य इत्यादी समस्यांनी लोक मेटाकुटीला येतात.
- आपली फसवणूक होऊन आपल्याला विकासाच्या लाभांपासून दूर ठेवले जात असल्याची भावना त्यांच्यात निर्माण होते.
- आर्थिक असमतोल निर्माण झाल्यामुळे राज्याराज्यांतील सलोखा नष्ट होतो.
- सलोख्याअभावी राष्ट्रीय ऐक्याला तडा जातो.
Click on link to get PDF from store
PDF : इयत्ता नववी- इतिहास-पाठ-३ : भारतापुढील अंतर्गत आव्हाने - नोट्स
PDF : इयत्ता नववी- इतिहास-पाठ-३ : भारतापुढील अंतर्गत आव्हाने - स्वाध्याय प्रश्नोत्तरे
Useful links :
Main Page : - Maharashtra Board इयत्ता नववी- इतिहास व राज्यशास्त्र -Marathi Medium - All chapters notes, solutions, videos, test, pdf.
Previous Chapter : धडा २ : भारत : १९६० नंतरच्या घडामोडी - online Notes Next Chapter : धडा ४ : आर्थिक विकास - online Notes |